Sunday, October 12, 2025
Latest:
महाराष्ट्र

राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थीचा १४ जुलैला विधांभवनावर धडक छत्री मोर्चा- हभप तुकाराम बाबा महाराज

Spread the love

राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थीचा १४ जुलैला विधांभवनावर धडक छत्री मोर्चा- हभप तुकाराम बाबा महाराज
★ ५० हजार प्रशिक्षणार्थी होणार सहभागी- बालाजी चाकूरकर
★ ३६ जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी प्रमुखांची सांगलीत पार पडली बैठक

सांगली:- विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने राज्यातील एक लाख ३४ हजार बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले. सहा महिन्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला पण आम्ही राज्यभर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्याची मुदतवाढ दिली. आता प्रशिक्षणार्थीची मुदत संपत आली असून त्यांनी पुढे काय करायचे असा सवाल उपस्थित करत युवा प्रशिक्षणार्थीच्या विविध मागण्यांसाठी येत्या १४ जुलैला मुंबई येथील आझाद मैदान ते थेट विधानभवन, मंत्रालय धडक छत्री मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम तुकाराम बाबा महाराज यांनी दिली. यावेळी नेते बालाजी पाटील चाकूरकर उपस्थित होते.

हभप तुकाराम बाबा महाराज यांनी राज्यातील ३६ जिल्ह्यांचा दौरा केला. युवा प्रशिक्षणार्थीच्या भावना, वेदना समजून घेतल्या. युवा प्रशिक्षणार्थीच्या मागणीसाठी हभप तुकाराम बाबा महाराज यांनी उभारलेल्या लढ्यामुळे यश मिळाले व त्यांना पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली. या युवा प्रशिक्षणार्थीना योग्य न्याय व सन्मान शासनाने द्यावा यासाठी हभप तुकाराम बाबा महाराज यांनी युवा प्रशिक्षणार्थी संघटना, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून लढा उभारला आहे.

मंगळवारी सांगली येथे राज्यातील ३६ जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी प्रमुखांची। बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हभप तुकाराम बाबा महाराज व युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे आक्रमक नेते बालाजी पाटील-चाकूरकर यांनी छत्री आंदोलनाची माहिती दिली.

हभप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांनी लाडका भाऊ म्हणत रोजगार दिला खरा पण आता बसल्या ताटावरून उठा म्हणून हाकलून लावले जात आहे. एक लाख ३४ हजार युवा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेवून जायचे कुठे, त्यांच्या रोजगाराचे काय हा सवाल शासनाला विचारण्यासाठी येत्या १४ जुलैला मुंबईत विराट छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे. एका बाजूला सेवानिवृत्त झालेल्याना सेवेची संधी दिली जात आहे तर दुसऱ्या बाजूला युवकांच्या रोजगारावर गंडांतर आणले जात आहे हे चुकीचे असल्याचेही हभप तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.

बालाजी पाटील- चाकूरकर म्हणाले, युवा प्रशिक्षणार्थीवर अन्याय किती करायचा याला मर्यादा आहे. शासनाने या सर्वांना सेवेत सामावून घ्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी येत्या १४ जुलैला किमान ५० हजार युवा प्रशिक्षणार्थीचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाने दखल घ्यावी व तत्पूर्वी मागण्या मान्य कराव्यात असे आवाहनही चाकूरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *